Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक
नियोजित संमेलनाचे प्रारूप, उपक्रम आणि गुरुकुंजाला कसे पोचावे याबद्दल इत्यंभूत माहिती देणारा व्हीडिओ.
शेतकरी साहित्य संमेलनाचे LIVE प्रसारण "शेतकऱ्यांची चावडी" या You Tube चॅनेलवर होणार आहे.
त्यासाठी आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



उद्देश आणि भूमिका

बळीराजा़ डॉट कॉमवर आपले सहर्ष स्वागत आहे.

बळीराजा़ डॉट कॉम

              अनेक दिवसापासूनची एक इच्छा होती की, कोट्यवधी शेतकरी असलेल्या या विशालप्राय देशात किमान काही हजार शेतकरी मंडळी एकाच व्यासपीठावर एकत्र येऊन शेती या विषयावर त्यांनी आपसात चर्चा केली पाहिजे. आपल्या सुखदु:खात एकमेकाला समरस केले पाहिजे. शेतीत आयुष्य व्यतीत केल्यानंतर आलेल्या अनुभवांची आपसात देवाण-घेवाण केली पाहिजे. नवनवे तंत्रज्ञान अवगत करताना आणि त्याचा आपल्या शेतीत वापर करताना येणार्‍या अडचणी सोडवून घेण्यासाठी आपसात विचारविनिमय झाला पाहिजे.

               शेतकरी संघटनेच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून एक कायमची खंत व्यक्त केली जात आहे की, जगाच्या इतिहासातील एवढी मोठी शेतकरी चळवळ, ज्या चळवळीच्या मेळाव्यांनी व अधिवेशनांनी गर्दीचे सर्व उच्चांक मोडले. ज्या चळवळीने लाखापेक्षा जास्त महिलांना एकत्र आणण्याचा विस्मयकारक चमत्कार घडवून आणला, इतिहासानेही तोंडात बोटे घालावी, असे आंदोलन यशस्वी करून दाखवले; त्या चळवळीला प्रसारमाध्यम आणि साहित्यक्षेत्रात मात्र फारशी चमकदार कामगिरी करून दाखवता आली नाही. या चळवळीला पूरक असे दर्जेदार साहित्यसुद्धा थोडाफार अपवाद वगळता फारसे काही निर्माण झाले नाही.
          मुळातच शेतकरी समाज मुका आहे. त्याला स्वतःला व्यक्त होण्याची संधीच मिळत नाही. आर्थिकस्थितीने पुरेपूर परावलंबी असल्याने इतरांना जे रुचेल तेच बोलण्याखेरीज त्याला पर्याय उरत नाही. त्याला बोलण्यापूर्वी पहिल्यांदा परिणामांचा विचार करावा लागतो. कर्ज देणे थांबवेल म्हणून सावकार किंवा बॅंकाच्या विरोधात बोलू शकत नाही. उधारीवर किराणा मिळणे बंद होईल म्हणून व्यापार्‍यांच्या विरोधात बोलू शकत नाही. ७/१२ चा उतारा मिळायला त्रास जाईन म्हणून प्रशासनाच्या विरोधात बोलू शकत नाही आणि पुढार्‍यावाचून तर बरेच काही अडते, मग त्यांच्या विरोधात बोलायची तो कशी काय हिंमत करू शकेल? अन्यायाने कितीही मर्यादा ओलांडल्या तरी..... त्याला त्याच्या मनातली खदखद जिभेवर आणताच येत नाही. सर्वांना रुचेल असेच बोलणे, हीच परिस्थितीची गरज असल्याने त्याला स्वतःची अशी भाषा उरतच नाही.
                परिणामांची तमा न बाळगता एखाद्याने स्वतःला व्यक्त करायचे ठरवलेच तर तसे व्यासपीठच उपलब्ध नाही. शेतकर्‍याकडे जो कोणी येतो तो त्याला ऐकवायलाच येतो, त्याचे ऐकायला कोणीच येत नाही. कृषिविभागाच्या किंवा राजकीय पक्षाच्या मेळाव्यांत तो केवळ श्रोता असतो. कागदावर लिहून पाठवले तर गैरसोयीचे असल्याने वृत्तपत्रही शेतकर्‍यांचे मनोगत छापण्याची हिंमत दाखवत नाही. पुस्तक लिहायचे तर छपाईचा खर्च परवडण्यासारखा नाही. रेडियो-टीव्ही यांना तर एकंदरीतच शेती या शब्दाची ऍलर्जी आहे. मग शेतकर्‍याने व्यक्त व्हायचे तरी कसे? अभिव्यक्ती व्यक्त करताच येत नसेल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य असून-नसून काय उपयोगाचे?
                   पण आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. शासन, प्रशासन आणि समाज यांनी नव्हे तर नियतीने व नव्या तंत्रज्ञानाने ती संधी शेतकर्‍यांना उपलब्ध करून दिली आहे. इंटरनेटने आता अल्पशा खर्चात अगदी दुर्गम प्रदेशातील आम माणसाला सुद्धा थेट जगाच्या नकाश्यावर आपली छाप सोडण्याची नामी संधी मिळवून दिली आहे. अगदी नाममात्र खर्चात आता इंटरनेटच्या माध्यमातून करोडो शेतकरी, जाती-पाती, धर्म-पंथ, स्त्री-पुरूष, देश-प्रांत या सर्व भेदाभेदाच्या सीमा ओलांडून एकाच वेळी एकाच व्यासपीठावर एकत्र येणे सहज शक्य झाले आहे.
                  तंत्रज्ञानाने गरूडझेप घेतली आणि सूर्य-चंद्र, मंगळ-अमंगळ तारे मनुष्याच्या टापूत यायला सुरुवात झाली. मात्र या कृषिप्रधान देशातला बहुसंख्य शेतकरी आणि एकूणच शेती हा विषय अडगळीत पडला आहे. विकासाच्या आणि प्रगतीच्या व्याख्येचे संदर्भ आणि अर्थ बदलत आहेत. शासनाच्या चुकीच्या आणि शेतकरी विरोधी धोरणामुळे शेती हा विषयच फारफार मागे ढकलला गेला आहे.
मंगळ कह्यात आला, कक्षेत तारका
भैरू अजून खातो, कांदा न भाकरी
                शेतकर्‍यांच्या अनेक पिढ्या उलटून गेल्या पण आमचा भैरू मात्र अजूनही कांदा-भाकर खाऊनच आला दिवस ढकलत आहे. त्याच्या न्याहारीचा 'मेनू' बिघडल्या घड्याळाच्या काट्यासारखा आहे त्याच स्थितीत स्थिर असून त्यात काही फारसा बदल घडत नाहीये. हे चित्र बदलण्याची सक्त गरज आहे. शेतकर्‍यांच्या जीवनातले नैराश्य संपून चैतन्य निर्माण होण्यासाठी आणि शेतकर्‍याच्या आयुष्यात सुखाचा व सन्मानाचा दिवस उजाडण्यासाठी प्रयत्न होण्याची नितांत आवश्यकता आहे.

                    शेतीचे यतार्थ चित्रण करणारे आणि परिवर्तनाला भाग पाडणारे साहित्य निर्माण झाले पाहिजे, असे आपल्याला वाटते. पण आपण म्हणतो की आम्ही मात्र लिहिणार नाही. ते इतरांनी लिहिले पाहिजे. आमचे आयुष्य जगलो आम्ही, आमच्या हालअपेष्टा भोगल्या आम्ही, आंदोलनात उतरलो आम्ही, तुरुंगाची हवा खाल्ली आम्ही, लाठ्यागोळ्या झेलल्या आम्ही आणि आम्ही म्हणतो की आम्ही लिहिणार नाही. ते कुणीतरी लिहावे. हे कसे शक्य आहे? हे कदापि शक्य नाही. शेतकरी चळवळीचा विचार पुढे नेणारी साहित्यनिर्मिती शेतकरी चळवळीमध्ये काम केलेला आंदोलक जेवढ्या प्रभावीपणे करू शकेल तेवढ्या प्रभावीपणे चळवळीबाहेरचा साहित्यिक करू शकणार नाही मग तो कितीही मोठ्ठा प्रभावशाली साहित्यिक असू देत. आपली अनुभूती आपणच साकारायलाच हवी. अस्सल आणि अभिजात लेखन करायला लेखनशैलीची गरज भासत नाही. बोबडेबोल जरी अस्सल आणि अभिजात असेल तर त्यात जिवंतपणा असतो व तो जिवंतपणाच त्या लेखनाला परिणामकारकता प्रदान करतो. लेखन करणे ही एक कला असते, हे मान्य; पण लेखनात कलाकौशल्य वगैरे वापरल्याने ते लेखन कलाकृतीकडे झुकते आणि मग ती कलाकृती वास्तविकतेपासून फारकत घेण्याची दाट शक्यता असते. कला ही कला असते आणि वास्तव हे वास्तव. त्यामुळे फारसा विचार करायची गरज नाही. जसे लिहिता येईल तसे आणि जसे जमेल तसे लिहायचा प्रयत्न शेतकर्‍यांनी करायलाच हवा.

म्हणून मित्रांनो..... या,
              "पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न" असे ब्रिदवाक्य असलेले बळीराजा डॉट कॉम (www.baliraja.com) हे संकेतस्थळ तुमच्यासाठीच आहे. येथे तुम्ही तुमच्या मनातल्या भावना स्पष्टपणे चितारू शकता. कविता, लेख लिहू शकता. इतरांच्या लेखनावर परखडपणे प्रतिक्रिया नोंदवू शकता. अगदी चारपाच ओळीचा मुद्दा किंवा मनोगत सुद्धा व्यक्त करू शकता. शेतकरी म्हणून जीवन जगताना आलेले अनुभव कथन करू शकता. आजवरच्या वेगवेगळ्या आंदोलनाविषयीची माहिती लिहू शकता. आंदोलनाचे तुमच्याकडे काही फोटो असल्यास ते प्रकाशित करू शकता.
            प्रवेश कसा घ्यायचा, सदस्यत्व कसे घ्यायचे, मराठीत कसे लिहायचे या विषयीची सर्व माहिती बळीराजा डॉट कॉम (www.baliraja.com) वर उपलब्ध आहे.
म्हणून काळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो.... या,
शेतीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण इथे थोडीशी धडपड करूया....!!
                                                                                                                              गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------------------------------
Share

प्रतिक्रिया