कथेचे नाव - गंधवार्ता एका प्रेताची
कथेचा विषय - कर्जबाजारीपणाची व्यथा सांगणारी कथा
लेखक - गंगाधर मुटे
कथा लेखक 'गंगाधर मुटे" लिखित कथेत कर्जबाजारी शेतकर्याच्या दुःखाचे वर्णन केले आहे. वास्तव चित्र दृष्टीसमोर उभे राहते. सतत कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी. दारिद्र्य त्याच्या पाचवीलाच पुजलेले. दुष्काळानं शेतात पिक नाही. अशावेळी सावकाराची, बँकांची दारे ज्याला बंद झाली असा शेतकरी कितीही निधड्या छातीचा असला तरी परिस्थितीनं तो खचून जातो. पण - तरीही लढत राहतो. त्याच्यामध्ये एक जिद्द लपलेली असते. मुलाबाळांचे स्वप्न तो रंगवत असतो. लेखक गंगाधर मुटे यांना 'अर्जुन'च्या प्रतिकातून कित्येक 'अर्जुन' दिसतात. एका बाजूने भरत गव्हाणकर सारखे शेतकरी शासकिय नोकरी सोडून शेतीत नवनवीन प्रयोग करतात. पण हाती काहीच लागत नाही. अर्थात तेच घडते. पण प्रयत्नांची शर्थ करणारा भरत भविष्याशी लढत राहतो. शिवाय शेतीबरोबर जोडधंदाही करतो. शांत, विवेकी, प्रसंगावधानी संकटांना सामोरा जाणारा शेतकरी.
कितीही प्रसंग आपणावर ओढवले तरी खचून न जाता प्रसंगांना तोंड द्यावे व आपल्या जीवनाचे सार्थक करावे. 'मी शेतकरी आहे, जगाचा पोशिंदा म्हणतात मला' असा संदेश लेखक येथे भरतच्या प्रतिकातून देतात.
माणसाचे जीवन हे क्षणभंगूर असते. त्याच्या वाट्याला काही दिवस सुख तर काही दिवस दुःखच असते. त्याला पोटापाण्याची चिंता असते.
मुला-बाळांचे प्रश्न दृष्टिसमोर असतात.खडतर आयुष्याचा मार्ग तो आक्रमित असतो.अशावेळी जगावे कसे? हाच त्याचा मुख्य प्रश्न असतो. लेखक गंगाधर मुटे यांनी म्हणी, वाक्प्रचार वापरुन कथेला धार आणली. कथानकातून वास्तव सत्य दृष्टीस पडते.लेखकाला कर्जबाजारी अर्जुन शेतकर्याचा मृत्यू, त्याच्या पत्नीचा मृत्यू, मुलींचे छत्र हरपल्याचे अफाट दुःख झाले आहे. हे हृदयाला छेदणारे दुःख. वाचकाच्याही हृदयाची तार तुटते. हे दुःख शेवंताने दिलेल्या टाहोवरुन व भरतच्या भरल्या हृदयाच्या टाहोवरुन मनाला छेदणारं आहे.
सदर कथेतील संवादातून ग्रामीण बोलीभाषेचा प्रभाव दिसून येतो. शेतकर्याचे कष्टमय जीवन,त्याला सतत दुःखाचे चटके सहन करावे लागतात; हे येथे हुबेहुब व्यथित केले आहे. 'अर्जुन' झाडावर लटकलेला, निलिमा निपचित पडलेली, शब्दाली मांजरीशी खेळत बसलेली, मुन्नीचा समंजसपणा हे सारे दृष्य दृष्टिपटलावर हायलाईट केल्यासारखे दिसतात. तसेच कान ग्रहण करण्याच्या योग्यतेचे नाहीत, दृष्याचे पृथक्करण, मेंदूस अर्थ पुरवण्याइतपत जाणीवा पक्व नसणे, गंधवार्ता कळणे ईत्यादी शब्दप्रयोगातून मन अगदी भावनावश होते. खरंय शेतकर्याला वाली नाहीच.....
संपूर्ण कथा मनाला भिडणारी आहे.
सौ.वीणा अजित माच्छी
डहाणू ,पालघर.
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
स्पर्धाविजेती प्रवेशिका.
स्पर्धाविजेती प्रवेशिका. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने