अनिल सा.राऊतरवी, 20/09/2015 - 17:17
(विश्वस्तरीय लेखन स्पर्धा २०१५)
:::::::: शरद जोशी :::::::
श-तकोटीतून एक जन्मला वीर तो
शेतकऱ्यांसाठी सदा लढला वीर तो
शेतकरी संघटना करूनी स्थापन
शेतकऱ्यांपाठी उभारला खंबीर तो.....
र-क्त आटवतो,देह झिजवतो वीर तो
धर्म शेतकऱ्यांचा जागवतो वीर तो
नका होऊ लाचार,नका होऊ भिकारी
पिचलेल्या शेतकऱ्यांना देतो धीर तो......
द-शा बळीराजाची संपवतो वीर तो
व्यवस्थेला पायाशी लोळवतो वीर तो
बुळबुळीत आश्वासनांना धिक्कारुनी
शब्दतलवारीने उडवितो शीर तो.....
जो-मात यशाकडे झेपावला वीर तो
स्फुल्लिंग भरतो आंदोलनाला वीर तो
कुशल त्या सारथ्यांना घेऊन सोबती
वर्मावर व्यवस्थेच्या सोडतो तीर तो.....
शी-णला लढून लढून आज वीर तो
प्रेरणा नव्या दमात भरतो वीर तो
तयार आम्ही उचलण्या या खांद्यावरी
अथांग निष्ठेने चळवळीचा भार तो...!
©अनिल सा.राऊत
9890884228
anandiprabhudas@gmail.com
अनिल सा.राऊतरवी, 20/09/2015 - 12:33
(विश्वस्तरीय लेखन स्पर्धा २०१५)
::::::: आमचा अधिकार :::::
तुम्ही आधीच लाचार
मुलखाचे लाळघोटे...
मतांसाठी लाचार
सत्तेसाठी लाचार
स्वत:ची पोतडी
भरण्यासाठी लाचार....
तुम्ही तर लाचारच
मुलखाचे नाटकी....
मानधनासाठी लाचार
ग्लॅमरसाठी लाचार
कलेचा बाजार
मांडण्यासाठी लाचार....
तुम्ही पिढीजात लाचार
पोळीवर तूपओढू....
देणगीसाठी लाचार
सेलिब्रेटींसाठी लाचार
नेत्यांची हुजरेगिरी
करण्यासाठी लाचार....
पण आम्ही कधीच
नव्हतो हतबल...
नव्हतो लाचार
हात पसरण्यासाठी....
व्यवस्थे,
कुठाय आमचा अधिकार
आमच्याच मालाची किंमत करण्याचा?
तूच घेतलास
हिरावून हक्क....
अन्
लाचार बनवलंस आम्हालापण-
आमच्याच अन्नावर जगणाऱ्यांसारखे....
फक्त एकदाच...
फक्त एकदाच देऊन बघ-
आम्हाला आमचा अधिकार....
तुझ्या छाताडाच्या फासळ्या
शाबूत राहिल्या तर मला विचार?
©अनिल सा.राऊत
9890884228
anandiprabhudas@gmail.com