Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक
नियोजित संमेलनाचे प्रारूप, उपक्रम आणि गुरुकुंजाला कसे पोचावे याबद्दल इत्यंभूत माहिती देणारा व्हीडिओ.
शेतकरी साहित्य संमेलनाचे LIVE प्रसारण "शेतकऱ्यांची चावडी" या You Tube चॅनेलवर होणार आहे.
त्यासाठी आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



राजकीय मेंदू करतोय भारतीय शेतीचा घात : कोरोना माहात्म्य ||१३||

लेखनविभाग: 
मागोवा
राजकीय मेंदू करतोय भारतीय शेतीचा घात : कोरोना माहात्म्य ||१३||
 

" जेव्हा जेव्हा इज्राएल शेतीचा विषय निघतो तेव्हा तेव्हा भारतीय शेतीतज्ज्ञ व अर्थतज्ज्ञ इज्राएलचा आदर्श घेऊन शेती करण्याचे भारतीय शेतकऱ्यांना सल्ले देतात पण इज्राएली सरकारचे शेतीधोरण शेतीला कसे पूरक आहे आणि भारत सरकारचे शेतीधोरण शेतीला किती प्रतिकूल आहेत याविषयी कुणीच बोलत नाहीत. ज्यांना धोरणात्मक समज व माहिती नसते ते अर्थतज्ज्ञ व शेतीतज्ज्ञ भोळसट असल्याने प्रामाणिकपणे वाचीव व ऐकीव माहितीच्या आधारे बोलतात आणि ज्यांना धोरणात्मक फरक माहित असतो, ते जाणीवपूर्वक तसे बोलतात कारण शेतीला लुटून शेतीतील बचत काढून महानगरे सजवणे हेच त्यांचे जीवितकार्य असते. "

nashik Agrowan      मागील वर्षी मी इस्त्राईल या चिमुकल्या पण जगभर कृषी तंत्रज्ञान विकसित राष्ट्र म्हणून नावलौकिक मिळवलेल्या देशाचा शेती अभ्यास दौरा करून आलो. इस्राईल हा भूमध्य समुद्रावरील मध्य-पूर्वेचा देश आहे. यहुदी, ख्रिस्ती आणि मुस्लिम हे बायबलसंबंधी पवित्र भूमी म्हणून मानतात. त्याची सर्वात पवित्र स्थाने जेरुसलेममध्ये आहेत. ओल्ड सिटीमध्ये मंदिर माउंट कॉम्प्लेक्समध्ये डोम ऑफ द रॉक मंदिर, ऐतिहासिक वेस्टर्न वॉल, अल-अक्सा मशीद आणि चर्च ऑफ द होली सेपुलचर यांचा समावेश आहे. इस्राईलचे आर्थिक केंद्र तेल अवीव हे बौहॉस आर्किटेक्चर आणि बीचसाठी प्रसिद्ध आहे. पण सभोवताली शत्रू राष्ट्रांचा वेढा असल्याने दर क्षणाला जगण्याची नव्हे तर जीवाची चिंता या इवल्याशा देशासमोर असते. आधी संरक्षण मग पोषण अशी एकूण त्या देशाची स्थिती. ९० लक्ष लोकसंख्येपैकी ३० लक्ष लोक सैन्यात दाखल होतात म्हणजे दर ३ माणसामागे एक सैनिक. त्यातही पुरुष व महिला असा भेद नाही. ३० लक्ष सैनिकसंख्येत महिलांचा वाटा १५ लक्ष. जितके पुरुष सैन्यात तितक्याच महिलाही सैन्यात. सैन्यामध्ये पुरुष व महिला यांचा समसमान वाटा असणारा इज्राईल हा जगातील एकमेव देश आहे.
 
      इतक्या विपरीत स्थितीतही इज्राईल जागतिक दर्जाचे कृषी संशोधन करतो. कसलाही नैसर्गिक समृद्ध भौगोलिक वारसा नसताना सुद्धा शेती उत्पादन क्षमतेत जगाला मागे टाकतो, ही बाब नक्कीच आश्चर्यजनक आहे.१५० पटीने लोकसंख्या आणि भौगोलिक आराजी असलेल्या भारतीयांनी इज्राईलला आपला शेतीतील गुरु मानावे, यातच सर्व आले. जेव्हा जेव्हा इज्राएल शेतीचा विषय निघतो तेव्हा तेव्हा भारतीय शेतीतज्ज्ञ व अर्थतज्ज्ञ इज्राएलचा आदर्श घेऊन शेती करण्याचे भारतीय शेतकऱ्यांना सल्ले देतात पण इज्राएली सरकारचे शेतीधोरण शेतीला कसे पूरक आहे आणि भारत सरकारचे शेतीधोरण शेतीला किती प्रतिकूल आहेत याविषयी कुणीच बोलत नाहीत. ज्यांना धोरणात्मक समज व माहिती नसते ते अर्थतज्ज्ञ व शेतीतज्ज्ञ भोळसट असल्याने प्रामाणिकपणे वाचीव व ऐकीव माहितीच्या आधारे बोलतात आणि ज्यांना धोरणात्मक फरक माहित असतो, ते जाणीवपूर्वक तसे बोलतात कारण शेतीला लुटून शेतीतील बचत काढून महानगरे सजवणे हेच त्यांचे जीवितकार्य असते.  
 
     या दौऱ्यात एका इस्त्राएली अधिकाऱ्याने एक गोष्ट सांगितली ती भारतीय मानसिकतेचे यतार्थ दर्शन घडवणारी आहे. ती गोष्ट अशी कि, एकदा जगातील सगळ्या देशाचे प्रतिनिधी मिळून देवाकडे गेले. सगळ्या देशातील प्रमुखांनी देवाकडे तक्रार केली, हे देवा! सगळ्या जगात सर्वसंपन्न भू -भाग एका भारत या देशाकडेच देऊन आपण आमच्यावर अन्याय केला आहे. त्यामुळे आम्हाला प्रत्येक गोष्टी प्रयत्नपुर्वक, कष्टपूर्वक आणि महत्प्रयासाने मिळवाव्या लागतात. पण भारतात मात्र निसर्गतःच अनेक गोष्टी सहजासहजी उपलब्ध आहेत,  हा आम्हा जगातील सर्व देशांवर अन्याय आहे.
 

" पण त्यासाठी शेतीचे शोषण करणारी व्यवस्था संपुष्ठात येऊन शेतीला अनुकूल ठरणारी पूरक धोरणे आखली गेली पाहिजेत. याबाबतीत जर इज्राएलच्या शेतीधोरणाचा आदर्श घेतला तर फायदेशीर ठरेल. कर्जाच्या विळख्यातून शेतीला सरसकट मुक्त केले तरच भारतीय शेतकरी प्रगत आणि भरघोस शासकीय सबसिडी मिळणाऱ्या जागतिक शेतकऱ्यांशी स्पर्धा करू शकेल. अन्य देशातील शेतकऱ्यांना जे तंत्रज्ञान उपलब्ध आहे तेच तंत्रज्ञान वापरण्याची मुक्तमूभा भारतीय शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, तरच भारत हे कृषीप्रधान राष्ट्र म्हणून पुनर्स्थापित होईल. "

देवाने या सगळ्यांचे तक्रारवजा निवेदन शांतपणे ऐकले आणि त्यांना एक गुपित सांगितले.
 
देव म्हणाला, "तुमच्या एक गोष्ट लक्षात आलेली दिसत नाही. भारताला संपन्न प्रदेश देतेवेळी मी अजून एक गोष्ट भारतियांना दिली आहे ती म्हणजे राजकारणाची आवड. त्यांच्या मेंदूत मी राजकारणापायी पिसाळण्याचा एक सूक्ष्मसा किडा टाकून दिलेला आहे. त्यामुळे भारताकडे संपन्न प्रदेश असूनही तिथल्या राजकारणी लोकांच्या आणि सामान्य जनतेच्या मेंदूतील किडा सदैव वळवळ करत राहील. त्यामुळे द्वेष, मत्सर, लोभ, मोह, माया आणि क्रोध सदैव त्यांना रचनात्मक कार्य कधीच करू देणार नाही. एकमेकांच्या तंगड्या ओढण्यालाच ते आपले जीवितकार्य समजून तसेच जगतील आणि तसेच मरत राहतील स्वतः मरतील आणि इतरांना मारतील. त्यांच्या संकुचित आणि हस्तक्षेपवादी विचारधारेमुळे त्यांना विकास करण्याचे भानच रहाणार नाही. गणपतीच्या बेंबीत बोट घालण्याचा उपद्व्याप करताना इंगळीचा चावा बसल्यावर ते थंडगार लागले असे सांगत इतरांनाही बोट घालायला लावतील. त्यामुळे भारतीय लोक प्रत्येक गोष्टीसाठी सतत तुमच्याकडे आस लावून बघत राहतील, तुमच्याकडे पदर पसरत येत राहतील आणि तुम्हाला आदर्श मानतील याचा बंदोबस्त मी करून ठेवला आहे."
 
          इस्त्राईल हा चिमुकला देश आणि तेथील जनसंख्याही चिमुकलीच. पण शेतीक्षेत्रात जे भरीव कार्य एका चिमुकल्याला करता आले ते भारतासारख्या महाकाय देशाला करता आलेले नाही. कारण इथे प्रत्येक गोष्ट राजकीय चष्म्यातून पाहिली जाते. अगदी कोरोना संकट आणि त्यावरील उपाययोजना सुद्धा राजकीय चष्म्यातूनच पाहिली गेल्याने सोपी समस्या किचकट होऊन बसली. ज्या देशात कोरोनाची उत्पत्ती झाली तो लोकसंख्येने विशाल असलेला चीनसारखा देश त्यावर काही महिन्यातच त्यावर नियंत्रण मिळवतो. संक्रमित रुग्नांची संख्या लाखाच्या आत आणि मृत्युसंख्या पाच हजाराच्या आत थांबवतो. "पुढच्याला ठेच मागचा शहाणा" असे म्हटले जाते पण इथे अगदी उलट झाले आहे. पुढचा ठेच खाऊन स्वतः शहाणा झाला आणि मागच्याने अतिशहाणपणा दाखवत होत्याचे नव्हते करून घेतले. "कुत्र्याले खांडूक झालं, चाटू चाटू मोठं केलं" या वऱ्हाडी म्हणीची प्रचिती यावी अशी दयनीय स्थिती भारतावर ओढवली आहे. 

          वानरांचा कळप शेतात घुसायला लागला तर शेतकरी त्याला दूरवर रोखून शेतात येऊन घुसण्यापासून अडवतात. शेतात घुसण्यापूर्वीच अडवले तरच वानरांना शेतात घुसण्यापासून प्रतिबंध करता येतो. एकदा शेतात वानर घुसली आणि शेतभर चौफेर पसरली तर त्यांना शेताबाहेर हाकलने एकट्या-दुकट्याला केवळ अशक्य असते. इकडला हाकलला तर तिकडले घुसतात आणि तिकडचा हाकलायला गेलो तर इकडले घुसतात. कोरोनाला सुद्धा देशभर अत्र-तत्र -सर्वत्र पसरण्यापासून प्राथमिक पायरीवरच प्रतिबंध करणे सहज शक्य होते. त्यासाठी सार्वत्रिक लॉकडाऊनखेरीज अन्य पर्याय नव्हता. पण अडाणी समजल्या जाणाऱ्या शेतकऱ्याला जितकी समज आणि जाण असते तितकीही भारतीय सुजाण समाजाला जाण नसल्याने प्राथमिक लॉकडाऊन अयशस्वी ठरला. जाणे-येणे-संचार सुरूच राहिला आणि अशा संचाराचे समर्थन करण्याचे कामही सातत्याने काही घटकांकडून होत राहिले. त्याचे मुख्य कारणही भारतीय लोकांचा राजकीय मेंदू हेच राहिले. परिणामी काही विशिष्ट भूभागात असलेला कोरोना देशात सर्वदूर कानाकोपऱ्यात पोचला. पाण्याविना पाण्याबाहेर मासा जगू शकेल पण भारतीय मनुष्य राजकारणाशिवाय जगणे केवळ अशक्य असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले.

 
         भारतीय शेतीवर कोरोनाचा आणखी कितपत प्रभाव पडेल याचा अदमास घ्यायचा असेल तर त्यापूर्वी कोरोना संकटाची पुढील स्थिती काय असेल याचा अंदाज घेणे आवश्यक ठरते. कोरोनाच्या नियंत्रणासाठी सारं जग आता लस निघण्याच्या शेवटच्या पर्यायावर येऊन स्थिरावले आहे. लस निघाली असल्याच्या, संशोधनास यश मिळत असल्याच्या उत्साहवर्धक शक्यता आहेत पण त्यासोबतच आणखी एक बाब लक्षात घ्यावी लागते कि, कोरोनावर परिणामकारक लस निघणे वाटते तितके सहज साध्य नाही. आधुनिक वैद्यकीय शास्त्राकडे सर्वच रोगाचे रामबाण इलाज आहेत, अशी एकंदरीत आजची स्थिती नाही. अजूनही दमा, कावीळ, न्यूमोनिया सारख्या दुर्धर व्याधीवर रामबाण इलाज अजूनही उपलब्ध नाहीच पण साधी सर्दी, पडसा, खोकला यावर लस किंवा रामबाण औषध होमियोपॅथी, आयुर्वेद आणि ऍलोपॅथीला अजूनही संशोधित करता आलेले नाही. त्यामुळे जमिनीवर पाय ठेऊनच कयास बांधले तरच काही अंशी खरे ठरण्याची शक्यता आहे. 
 
       हा सगळा एकंदरीत विचार करता जर यदाकदाचित कोरोना आणखी काही वर्ष नियंत्रित आणता आला नाही तर सर्वच क्षेत्रात आमूलाग्र बदल होऊन उलथापालथ होईल. पण तरीही एका बाबतीत देश अगदीच निर्धोक आणि कोणत्याही स्थितीत पुरेपूर स्वावलंबी राहू शकेल आणि ते क्षेत्र आहे शेतीक्षेत्र. कोरोना प्रकोपाच्या काळातही अन्न व वस्त्राच्या बाबतीत देशाला अजिबात चिंता करावी लागणार नाही. इतकेच नव्हे तर अर्ध्या जगाला पोटभर खाऊ घालण्याची व वस्त्रे नेसवण्याची क्षमता भारतीय शेतीत आहे. त्यातून परकीय चलनाची गंगाजळीचा प्रवाह भारताकडे वळता होऊन देशाची आर्थिक स्थितीही सुधारू शकते.
 
      पण त्यासाठी शेतीचे शोषण करणारी व्यवस्था संपुष्ठात येऊन शेतीला अनुकूल ठरणारी पूरक धोरणे आखली गेली पाहिजेत. याबाबतीत जर इज्राएलच्या शेतीधोरणाचा आदर्श घेतला तर फायदेशीर ठरेल. कर्जाच्या विळख्यातून शेतीला सरसकट मुक्त केले तरच भारतीय शेतकरी प्रगत आणि भरघोस शासकीय सबसिडी मिळणाऱ्या जागतिक शेतकऱ्यांशी स्पर्धा करू शकेल. अन्य देशातील शेतकऱ्यांना जे तंत्रज्ञान उपलब्ध आहे तेच तंत्रज्ञान वापरण्याची मुक्तमूभा भारतीय शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, तरच भारत हे कृषीप्रधान राष्ट्र म्हणून पुनर्स्थापित होईल.
 
       पावलापावलावर शेतीवर निर्बंध लादून व स्वातंत्र्याचे सर्व हक्क नाकारून शेतकऱ्याला जागतिक शेतीशी स्पर्धा करायला सांगणे म्हणजे एखाद्याचे हातपाय बांधून त्याला जागतिक दर्जाच्या पहेलवानाशी कुस्ती खेळायला सांगण्याइतका जागतिक दर्जाचा महामुर्खपणा आहे.
 
       भारतीय शेतकऱ्याला जागतिक शेतकऱ्यांशी घमासान स्पर्धा करून भारतीय शेतकरी जगज्जेता शेतकरी म्हणून बघायचा असेल तर तोडाच एकदा त्याच्या पायातील बेड्या आणि देऊन बघा स्वातंत्र्य! या देशाला सर्वांगीण समृद्ध व स्वावलंबी करण्याची शक्ती व निपुणता केवळ आणि केवळ फक्त शेतकऱ्यांमध्ये आहे,
 
- गंगाधर मुटे आर्वीकर 
(क्रमशः)
=============
या लेखमालेतील इतर लेख http://www.baliraja.com/carona इथे उपलब्ध आहे.
==============
(साप्ताहिक "नाशिक ऍग्रोवन" दिवाळी अंकात प्रकाशित)

नाशिक ऍग्रोवन

नाशिक ऍग्रोवन
नाशिक ऍग्रोवन
नाशिक ऍग्रोवन

Share

प्रतिक्रिया