Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक
नियोजित संमेलनाचे प्रारूप, उपक्रम आणि गुरुकुंजाला कसे पोचावे याबद्दल इत्यंभूत माहिती देणारा व्हीडिओ.
शेतकरी साहित्य संमेलनाचे LIVE प्रसारण "शेतकऱ्यांची चावडी" या You Tube चॅनेलवर होणार आहे.
त्यासाठी आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



आत्मशक्ती हीच सर्वश्रेष्ठ शक्ती : भाग १४

लेखनप्रकार : 
आयुष्याच्या रेशीमवाटा
वाङ्मयशेती: 
आयुष्याच्या रेशीमवाटा
"आयुष्याच्या रेशीमवाटा" : भाग १४
आत्मशक्ती हीच सर्वश्रेष्ठ शक्ती
 
           माझ्या मुलाच्या जन्माच्या वेळी अकस्मात गंभीर स्थिती उद्भवली होती. तातडीने गावापासून दूर ५० किमी अंतरावरील सेवाग्राम रुग्णालयात पेशंट दाखल करावा लागला. प्रसूती झाली, बाळ जन्माला आले पण सारे प्रकरणच एकदम गंभीर असल्याने मलाही तिथेच तब्बल १४ दिवस ठाण मांडून बसावे लागले. रुग्णालयातून सुट्टी झाल्यावर घरी आलो आणि कपडे बदलले. गेली १५ दिवस खुंटीला लटकून असलेल्या शर्टच्या खिशात सहज हात घातल्यावर हाताला एक कागद लागला. कागद बाहेर काढला आणि मजकुरावर नजर पडताच मी निदान पंचवीसेक फूट तरी उंच उडालेलो असेल किंवा ११०० किलोवॅटचा जबरी झटका तरी मला नक्कीच बसला असेल कारण त्याक्षणी माझी अवस्थाच तशी झाली होती. अचानक तोंडातून मोठा आवाज निघाल्याने काय झाले म्हणून बघायला घरातील सर्व मंडळी माझ्या भोवताल गोळा झाली होती. असे काय असेल त्या कागदात?
 
           अचानक आठवण झाली की मी १५ दिवसापूर्वी स्वतःच आजारी होतो. आठवडा संपूनही आजारातून आराम मिळण्याऐवजी सतत वाढतच चालल्याने मला तालुक्यातील रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. मला कावीळ झाल्याचे निदान होऊन औषधोपचार करण्यात आले होते. त्याचाच तो कागद होता म्हणजे डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन होते. औषधोपचार आटोपून मी घरी येऊन रुग्णशय्येवर पहुडलो होतो आणि तास-दोन तासातच वरील गंभीर प्रसंग उद्भवला होता. त्यात माझा कावीळ कुठे चोरीस गेला, तो कुणी पळवला हे मला अजूनही कळलेले नाही. मीच नव्हे माझे पूर्ण कुटुंबीय सुद्धा मी आजारी असल्याचे विसरून गेले. मी पुढील चौदा दिवस इतका निरोगी होतो की त्या कावीळची आठवण सुद्धा कधीच झाली नाही. कावीळसारखा जीवघेणा आणि क्लिष्ट स्वरूपाचा रोग अचानक असा कसा गायब झाला असेल? कुणी गायब केला असेल? दैवी शक्तीने की आत्मशक्तीच्या स्वसामर्थ्याने?
 
           मी सामाजिक कार्यात असल्याने अनेकदा गावातील व्यक्ती आजारी पडून अतिगंभीर अवस्थेत पोचला की त्याला १६ किमी अंतरावरील रुग्णालयात घेऊन जाण्याची जबाबदारी माझ्यावर येते. आम्ही जेव्हा रुग्ण घरातून वाहनापर्यंत नेतो तेव्हा त्याला चार-पाच लोकांनी मिळून उचलून न्यावे लागते. दवाखान्याजवळ पोचलो की दोन माणसांनी आधार दिला की रुग्ण हळूहळू चालत डॉक्टरपर्यंत जाऊ शकतो. डॉक्टरने नाडी बघितली, स्टेथोस्कोप लावला आणि सांगितले की जा, अमुक अमुक बेडवर झोपा. तर तोच रुग्ण स्वतःच चालत चालत बेडपर्यंत जातो आणि झोपतो. बहुतांश वेळा थोड्याफार फरकाने असेच घडत असते, हा माझा स्वानुभव आहे. जो रुग्ण अनेक दिवस खाटेवर स्वतःहून उठून बसू शकत नव्हता, उभा होऊ शकत नव्हता तोच रुग्ण डॉक्टरच्या दिशेने निघाल्यावर कसाबसा उठून उभा व्हायला लागतो. डॉक्टरांनी तपासल्याबरोबर स्वतःच्या पायाने चालायला लागतो. काय असतो हा चमत्कार? 
 
           मी आता डॉक्टरकडे चाललोय म्हणजे आता माझी प्रकृती ठीक होणार, असा आत्मविश्वास निर्माण झाला की आत्मबलही आपोआपच वाढायला लागते. आत्मबल वाढायला लागले की शरीर साथ द्यायला लागते. रोगासोबत शरीरच लढत असते. शरीराची शक्ती क्षीण झाली तर औषधोपचाराने आपण शरीराची लढण्याची शक्ती वाढवत असतो. जर शरीर साथ देत नसेल तर जगातली सर्व औषधे निरुपयोगी आहेत. जर रुग्ण अतिगंभीर अवस्थेत पोचला  आणि शरीराने साथ द्यायला नकार दिला तर अशा प्रसंगी डॉक्टर अजिबात उपचार सुरू करत नाहीत. ते तोपर्यंत थांबतात जोपर्यंत शरीर उपचाराला प्रतिसाद देण्यायोग्य समर्थ होत नाही.
 
           आजारासोबतच लढण्यासाठी प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आत्मबलाचा उपयोग होतो असे नव्हे तर बोलण्या-चालण्या-वागण्यात देखील जिथे जिथे प्रतिकार करण्याची गरज भासते तिथे तिथे आत्मबलाचा उपयोग होतो. प्रवाहासोबत पोहायलाही आत्मबलाची आवश्यकता असते आणि प्रवाहाच्या विरोधात पोहतानाही आत्मबलाची गरज भासते. शरीराची कितीही दमछाक झाली आणि पंख गळायला आले तरी आत्मबल जर कणखर असेल तर उत्तुंग भरारी घेणे आपल्या आवाक्याबाहेर नसतेच. 
 
आयुष्याच्या वळणावरती जेव्हा पुरता दमून गेलो
पोट बांधले पायाशी अन् हात हवेचा धरून गेलो
 
           ज्ञान, विज्ञान, श्रद्धा, विश्वास, भक्ती, शक्ती, युक्ती, अभ्यास, चिंतन, मनन या सर्व स्रोतांचा उपयोग आत्मभान जागवण्यासाठी होतो. त्यातूनच आयुष्याच्या चतुरस्र रेशीमवाटा समृद्ध होत जातात.  
 
- गंगाधर मुटे, आर्वीकर
===============
महाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन "आयुष्याच्या रेशीमवाटा"
भाग १४ - दि. २५ एप्रिल, २०२० - "आत्मशक्ती हीच सर्वश्रेष्ठ शक्ती"
==========

आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी Fingure-Right http://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.
==========

  रेशीमवाटा

Share