Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



तोंडी, लेखी व प्रयोगशाळेतही मेरीटचे गुण

लेखनविभाग: 
पुस्तक समीक्षण
तोंडी, लेखी व प्रयोगशाळेतही मेरीटचे गुण घेणारा
गझलसंग्रह : "माझी गझल निराळी"
 

           हल्ली अनेक कवी गझल लेखनाकडे वळले आहेत. अरबी, फारशी, उर्दू अशी होत होत गझल मराठीत आली. मराठीपूर्वी ती हिंदी व गुजराथीत आली. पूर्वीची गझल ही शराब आणि शबाब ह्या विषयाभोवतीच घुटमळत होती. आता ती विविधांगी बनत चालली आहे. जनजीवनातील अनेक सत्ये परखडपणे गझलेमध्ये मांडली जात असताना गंगाधर मुटे सारखे मातब्बर, कर्तबगार, प्रॅक्टिकल अनुभवी कवी गझलेच्या प्रेमात पडले व त्यातून व्यक्तिगत अनुभव अवलोकन व चिंतन याद्वारे सृजनशील लेखणीतून सत्य मांडण्यात शतप्रतीशत यशस्वी झाले व साकारला गझलसंग्रह "माझी गझल निराळी".

             आपल्या दैनंदिन जीवनातील अनुभवाचं चिंतन त्यांनी आपल्या गझलेत ओतलं तेव्हा वाचकाला त्यातील यथार्थता पटते. हेच मुटेंच्या यशस्वी गझलेचं गमक आहे.
उदा.

"गाळून घाम विणले मी वस्त्र स्वावलंबी
केल्यात पार चिंध्या खिजवून पावसाने"  

             हा कृषकाच्या जीवनातील भयाण भेसूर असा अनुभव. या एकाच शेरात संपूर्ण कृषकाचे जीवनच समोर येते. अशा ताकदीचा यथार्थ शेर लिहिणारा गझलकार विरळाच.

             एक सच्चा शेतकरी, शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता जेव्हा हे जाणतो की गझलेचे सहा शेर सहा स्वतंत्र कविता ठरू शकतात. वेगवेगळा आशय आनंद देऊ शकतात तेव्हा हा एक शेतकरी व्याकरणाचा अभ्यास करतो. गझल तंत्राचा अभ्यास करतो व यशस्वी गझल लिहितो. ही गोष्ट वाटती तेवढी सोपी नाही. मी एक रसिक या नात्याने त्याच्या चिंतनाला अभ्यासाला, अनुभवाला व त्यांच्या गझलांना वंदन करतो.
 
म्हटलेच आहे "सिर्फ बंदीशे अल्फाज काफ़ी नही गझल के लिये, जिगर का खूं भी चाहिये असर के लिये" आणि खरोखरच गंगाधर मुटे यानी आपल्या गझलांमध्ये प्रत्यक्ष प्राण ओतला म्हणून त्या परिणामकारक ठरल्या आहेत.
             ज्यांच्या गझलांना सुधाकर कदमांची (पुणे) प्रस्तावना, भीमराव पांचाळेंचे पाठबळ, प्रदीप निफ़ाडकर, प्रमोद देव(मुंबई), स्वामी निश्चलानंद(अरुणाचल प्रदेश) यांच्या कौतुकाची छाप मिळावी त्या गझलांवर माझ्यासारख्या एका छोट्या व्यक्तीने तोंडी, लेखी व प्रयोगशाळेतही मेरीटचे गुण घेणाऱ्या ह्या गझलावर चार शब्द लिहिणे ही केवळ औपचारिकताच.

"मरणे कठीण झाले" ह्या पहिल्याच रचनेत आश्वासक भरवशाचं असं काहीच राहिलं नाही त्यामुळे माणूस भरकटत चालला. यदाकदाचित तो रस्त्यावर आला तरी त्याला चकवणारे असे खूप आहेत असा आशय व्यक्त होतो.
 
"दिसतात अभय येथे चकवे सभोवताली
 रस्ताच जीवनाचा सुचणे कठिण झाले"

स्वलेखनाने स्वानंदा सोबत परमार्थही साधावा बघा हा शेर

"आनंद भोगताना परमार्थही साध्य व्हावा
असलेच कार्य कर तू दोहे मला म्हणाले"
 
कर्म और भाग्यका किताब है जिंदगी, पाप और पुण्य का हिसाब है, जिंदगी जेव्हा कर्म करताना भाग्य फळाला येते तेव्हा आपसूकच नशीब फळते.
 
"प्राक्तन फिदाच झाले यत्नास साधतांना
मोती पुढ्यात आले वाळूस गाळतांना"        
भारतातील सद्य परिस्थितीचे वर्णन खालील शेरामध्ये बघा. सर्वांना नोकरी हवी मग शेती कुणी करायची असा काहीसा आशय.
 
निघून गेलेत शहाणे सर्व साहेब बनायला
मूर्ख आम्ही येथे उरलो, मोफत अन्न पिकवायला    

             आसवांची अनेक रूपे जसे बेजार आसवे, दिलदार आसवे, कलदार आसवे, हळुवार आसवे, अंगार आसवे, झुंजार आसवे रेखाटलेली आहेत "भांडार हुंदक्यांचे" या रचनेत. दुःखांत सोबतीला नाही कुणी सवे, साथ ज्यांनी निभवली ती फक्त माझी आसवे, असा काहीसा आशय असणारा हा त्यातील एक शेर.

धुत्कारले जगाने, नाकारले सख्यांनी
तेव्हा दिला मनाला आधार आसवांनी

             शेतकरी ग्रामीण जनतेची परिस्थिती खूपच वाईट आहे. त्याला सगळेच नाडवतात. जंगली श्वापदे, शहरी नागरिक, सहकार, सावकार, निसर्गासह सगळेच. वर्षानुवर्षे हेच सुरू आहे. म्हणून आता त्याच्या समस्या संपतील असं काहीतरी करायला हवं. वाचा "शस्त्र घ्यायला हवे" ही गझलरचना. (पान क्र २८) नमुन्यादाखल एक शेर;
श्वापदे पिसाळलीत शस्त्र घ्यायला हवे
झोपले असेल शेत जागवायला हवे

             गझलकार गंगाधर मुटे यांची शेती, शेतकरी, त्यांच्या समस्यांचा पूर्व अभ्यास व अनुभव. म्हणून बहुतेक सर्व गझलांमधून कळवळा, वास्तवता, गरिबी, त्याला छळणारे नेते, पुढारी, अधिकारी, उत्पन्न खर्च वगैरे सर्व शेती संबंधितच विषय आढळून येतो. आपमतलबी पुढारी, सत्ताधारी व विरोधकही सर्व नाटकी भाषा बोलतात. प्रलोभने पेरतात त्यांना त्यांची जागा दाखविली पाहिजे, याकडे अंगुलीनिर्देश करणारी "नाटकी बोलतात साले" ही रचना. त्यातील एक शेर बघा. 
 
"कोणीतरी यांची आता पडजीभ उपटली पाहिजे
नाटकी बोलतात साले की गरिबी हटली पाहिजे"

             गंगाधर मुटेंच्या गझलांत सुंदर अशा प्रतिमा व प्रतीकांची वापरही दिसून येतो; जसे शुभ्र कावळे, पांढरे पक्षी, चकवे, बत्तीस तारीख, मेड इन चायना, वाचाळ राजसत्ता, रानहेला, राजकीय पहेलवान वगैरे वगैरे. बघा हा जबरदस्त शेर;
 
"लोंढेच घोषणांचे दिल्लीवरून आले
येणार वित्त आहे बत्तीस तारखेला"

"सोकावलेल्या अंधाराला इशारा आज कळला पाहिजे
वादळ येऊ दे कितीही पण दीप आज जळला पाहिजे"

             वरील शेर वाचला की आठवतो, "तुफानातील दिवे आम्ही तुफानातील दिवे, वादळवारा पाऊस धारा मुळी ना आम्हा शिवे" यूज अँड थ्रो च्या काळात माणसाचंही मन सुद्धा नाटकी झालं, बेभरवशाच झालं. असा आशयाचा हा शेर;
 
"चला वापरा एकदा आणि फेका हवी ती खरीदी नव्याने करा
इथे काळिजेही दिखाऊ-विकाऊ हृदय भासते मेड इन चायना"

             पशू पक्षी ही किटके किती बघ मेळ करून राहती, आपत्ती येता कोणती अती संघटुनिया धावती, तू मानवाचा देह असुनि का न तुजही भावना, ऊठ आर्यपुत्रा झडकरी कर सामुदायिक प्रार्थना या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सामुदायिक प्रार्थनेच्या आशयासी साम्य असणारा मुटे यांचा हा शेर वाचा;
 
पाखरेही एकी करतात जरासे पंख फुटल्यावर
पण तुला कधी मिशा फुटणार? सांग माणूस म्हटल्यावर?

शेती करणे म्हणजे कनिष्ठता, मूर्खता याउलट नोकरी करणे म्हणजे श्रेष्ठपणा असा जो सध्या सामाजिक समज रूढ झाला आहे त्यावर मार्मिक टिप्पणी करताना मुटे लिहितात,
 
"शेती करून मालक होणेच मूर्खता
सन्मान मोल आहे कर अभय चाकरी"
जास्तीत जास्त शरीर उघडे टाकून कमीतकमी वस्त्र वापरण्याच्या ’फॅशन’वर आसूड ओढताना मुटे म्हणतात
 
"ललना पाहून कपडे शरमले
मते पाहताच नेते नरमले"
भ्रष्टाचारावरही श्री मुटे आसूड ओढून लिहितात की, ही व्यवस्थाच किडली आहे
"टाळूवरील लोणी खाण्यास गुंतला जो
सत्कारपात्र तोची मशहूर थोर झाला"
 
"सरकारी खजिन्यावर मारून घ्यावा हात
चिरीमिरी दिली तरी मिटून जाईन वाद"
पाहून घे महात्म्या इथली शिवार राने
केला भकास भारत शोषून इंडियाने
 
सम्पूर्ण सातबारा कोरा करू म्हणाले
भुललेत भाडखाऊ दिल्लीत पोहचल्याने.....
 
मुर्दाड शासकांना सोयऱसतुक नाहीं
हकनाक तुच मरशील गळफास घेतल्याने...
....
कायम गहाण सारे करण्यास सातबारा
बँकेसमोर झाले लाचार शेत आहें
 
छाटून पंख आधी केलेय जायबंदी
आता पुन्हा शुभेच्छा उडण्यास देत आहें......
 
सगळे मंत्री-संत्री, अधिकारी, प्रामाणिक, त्यागी व दयाशील आहेत असं दिसून येत नाहींत याउलट असंख्य भ्रष्ट, लिप्त दिसून येतात. त्यावर खरमरीत भाष्य करणारा हा शेर 
 
दावा मला कुणीही कुठलाय एक मंत्री
निर्मोह.. त्याग.. करुणा.. ज्याच्या कथेत आहें 
 
शासन दरबारी खेडे व शहर हा भेदही केल्या जातो. त्यामुळे शासकीय योजनाचा वाटप समान होत नाहीं... यावर मुटे सर छान भाष्य करतात
 
भेद शासका कश्यास नागरी व गावठी
वाटणे निधी समान हे शिकायला हवे
 
आणखी काही शेर बघा
 
लोकराज्य कल्पनेत शासकास चाकरी
सेवकासम त्यास वागवायला हवे 
 
शासनात एकसूरीपणा आला आहें त्यावर मुटे सर म्हणतात
 
तेच तेच रोग आणि त्याच त्याच औषधी
एकदा तरी निदान नीट व्हायला हवे
 
शेतकऱ्यांची लूट सतत सुरु असते.. त्यावर सरांचा हा मार्मिक शेर
 
"खाऊ लुटून मेवा "हे ब्रीद शासकाचे
क्लूपती जमेचना ते सत्तधुरीन नाहीं
 
शेतकऱ्यांना मदत करण्याचा आव आणताना राशन ऐवजी भाषण दिले जातेय...
 
मरतोय अन्नदाता पर्वा न शासकांना
करतात भाषणे ते आणून आव सस्ता
 
एकूणच शेतीविषयक राजकीय धोरणे शेतीशी सुसंगत नसून विसंगत आहें, शेतकरी शासनाकडूनही नाडवल्या जात आहें, असं हे चित्र विचित्र आहें
 
शेतकरी विरोधी कायद्यामुळे तो अजूनही पारतंत्र्यात आहे. गंगाधर मुटे सारखे शरद जोशीच्या मार्गावर चालणारे फार थोडे लोक, नेते, लेखक, कवी ही शेतकरी स्वानंत्र्याची लढाई लढत आहेत, आयात निर्यात धोरणातील धरसोड शेतकऱ्यांची अडवणूक करते. कर्मचारी वर्गाचे वेतन वाढवताना शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावाचा विचारच केला जात नाहीं. कधीकाळी चांगलं पीक आलं तर भाव खाली येतात. असली राजकीय धोरणं काय कामाची?  बरं शेतकऱ्यांच्या संघटना तरी शेतकऱ्यांची बाजू भक्कमपणे मांडण्यात यशस्वी होतात काय? बरं सर्व शेतकरी तरी एका झेंड्याखाली येऊ दिल्या जातात काय? याचे उत्तर "कदापि नाही" असेच आहे. 
 
असंघटित वर्ग म्हणूनही राजकीय धोरणं त्यांच्या बाजूनं आखलं जात नाही. शेतकऱ्यांच्या समस्याची जाण ठेऊन, अभ्यास करून राजकीय वा शासकीय धोरणं ठरवल्या जात नाहीत, उलट पळवाटा काढल्या जातात. गुरं-ढोरं शेतकरीच पाळतात. तोटा सहन करुन त्यांचं मुलांबळाप्रमाणे संगोपण करतात. गुरे कामी असोत वा नसोत, दुधाळ असोत वा नसोत, ही बाब तर कुणी विचारातच घेत नाही. शासनाला तरी ही बाब माहित आहें की नाही देवच जाणे! या सर्व शेतकरी समस्याचा विचार करुन राजकीय धोरण, निती, आराखडा आखल्या गेला पाहिजे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात आपण शेतकऱ्यांसाठी काहीही करू शकलो नाही याची जाण आपणास आहें की नाहीं हेच कळत नाही. स्पष्ट दिसत असूनही आंधळ्याचे सोंग घेणे बंद करावे व आतातरी सुसंगत राजकीय धोरण आखायला सुरवात केली जावी यासाठी साहित्यिकांनीही पुढाकार घेऊन आपल्या लेखण्या परजल्या पाहिजेत.
 
             एकंदरीत अशा ७४ दालनांचा हा वैभवशाली खजिना आहे. याला हवा रत्नपारखीच. वाचकही भाग्यवान, हा खजिना वाचून आणि भाष्य करून मी धन्य झालो. पण यावरील हे भाष्य किंवा या समीक्षणात मावेल एवढी मुटेंची गझल लहान नाही. ती संग्रहीच असावी आणि वेळोवेळी वाचावी, अभ्यासावी अशी आहे.
 

गझलकार श्री मुटे यांना पुढील साहित्य प्रवासासाठी शुभेच्छा.

- तुळशीराम बोबडे
    अकोला
=-=-=-=-=

Share