![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
दोन तीन वेळा शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी साहेबाच्या सभेला उपस्थित राहण्याचे व साहेबांनी माझा एक लेख माझ्याकडून एका सभेत स्वतः मागून घेतला. आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील श्री.वामनराव जाधव, स्व. रमेश पागोरे, मधुकर खरात इत्यादी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी माझा परिचय करून दिल्यामुळे हे भाग्य मला लाभले. मी लिहीत राहिलो. दोन कथा संग्रह, दोन लेख संग्रह, एक कादंबरी, एक कविता संग्रह असे जवळपास सहा पुस्तके प्रकाशित झाली. त्यामुळे मला कायम स्व. शरद जोशी साहेब यांच्याबद्दल व शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्याबाबत आस्था राहिलेली आहे पण नोकरीमुळे सक्रिय सहभागी कधीच झालो नाही फक्त लिहीत राहिलो.
शेतकरी मराठी साहित्य संमेलन मला भावल्यामुळेच मी दि.८ व ९फेब्रुवारी रोजी १२ व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन, जयसिंगपूर, जि.कोल्हापूर येथे सहभागी होऊन दोन दिवस उपस्थित राहून मान्यवरांचे शेती आणि शेतकऱ्यांच्या सद्याच्या काळातील त्याच बरोबर पुढील काळातील भेडसावणाऱ्या समस्या बाबत चर्चा, विचार, मते, इत्यादी झालेले वैचारिक मंथन आत्मसात करून घेतले तसेच कविसंमेलन, शेतकरी गझल मुशायरामधून कवी, गझलकार यांनी आपल्या रचनेमधून कष्टकरी शेतकऱ्याच्या वास्तव जीवनावर आधारित पोटतिडकने मांडल्या. मला सुद्धा कविसंमेलनात कविता सादर करण्याची आयोजकांनी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आयोजकांचे मनःपूर्वक आभार!
साहित्य संमेलनाचे संयोजक ऍड. श्री.सतीश बोरुळकर साहेबांच्या संकल्पनेतून अक्षांशस्वर, दिव्यदृष्टी कलाकार, मुंबई यांनी "शेतकरी भक्ती प्रभात" या सुरेख, मधुर आवाजात भक्तिमय वातावरणात सर्वच कलाकारांनी गायलेली बहारदार गीते, वाद्यवृंदांची साथ देणारे सुद्धा तितक्याच ताकदीचे वादक कलाकार. त्यांमुळे गायक व वादक यांची जुळलेली साथ उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध करून दाद मिळविली. स्वागताध्यक्ष आमदार मा.श्री.राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब, मा.श्री.संजय भाऊ पाटील यड्रावलकर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आयोजनात व नियोजनात कोणत्याही प्रकारची कमतरता पडू दिली नाही. भव्यदिव्य असे सहकार महर्षी श्यामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह उपलब्ध करून दिले. असे नाट्यगृह मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर, अशा प्रकारच्या मोठमोठ्या शहरात पाहायला मिळतात पण तालुका सुद्धा नसलेल्या जयसिंगपूर मध्ये पाहायला मिळाले. ते सुद्धा सर्व सोयीयुक्त आणि स्वच्छ. खरोखरच राजकीय नेत्यांच्या कलेकडे पाहण्याच्या दूरदृष्टीला दाद द्यावीच लागेल!
कार्याध्यक्ष म्हणून मा. श्री.गंगाधर मुटे सर व त्यांचे सर्व सहकारी यांनी साहित्य संमेलनामध्ये बारकाईने लक्ष केंद्रित करून तज्ज्ञ मान्यवरांना निमंत्रित करून उपयुक्त चर्चासत्र आयोजित करून उपस्थित प्रतिनिधींना बौद्धिक विचारांची शिदोरी दिली. संमेलनाच्या अध्यक्षा शेतकरी संघटनेच्या ज्येष्ठ नेत्या, माजी आमदार सौ. सरोजताई काशीकर व उद्घाटक म्हणून शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार मा.ऍड.श्री.वामनराव चटप साहेब दोन्हीही वक्त्यांनी शेतकऱ्यांच्या वस्तुस्थितीवर आपले प्रखर विचार व्यक्त केले. बारावे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन यशस्वी झाले त्याबद्दल सर्व मान्यवरांचे मनपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा!
साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष मा. श्री. गंगाधर मुटे सरांनी केवळ कष्टकरी शेतकरी डोळ्यासमोर ठेवून शेतकरी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करून साहित्य संमेलनामध्ये फक्त शेतकऱ्याच्या प्रश्नावर त्यांच्या वास्तव जीवनावर आधारित चर्चा घडवून आणून साहित्यातून खरा शेतकरी उभा करून त्यांचे लहान मोठे प्रश्न, त्यांचे खडतर जीवनमान मांडण्यासाठी साहित्यप्रातांत नवी वाट निर्माण करून दिली आहे. त्यामुळे अनेक साहित्यिकांच्या पिढ्या उदयाला येऊन ज्या पद्धतीने यापूर्वी ग्रामीण साहित्याच्या माध्यमातून साहित्यिकांनी आपल्या अकलेचे तारे तोडून मराठी चित्रपटातून, कथा, कादंबरीमधून शेतकऱ्यांना खलनायक म्हणून पुढे आणून झुळझुळ मोटाच पाणी, शेतात हिरवागार ऊस, श्रीमंत दाखवून त्याच बरोबर टिंगलटवाळी करून विनोदीपात्र बनवून प्रेक्षकांची करमणूक करून खिसे भरले. पेरणीच्या वेळेस तर कंपन्या आपले बी बियाणे, कीटकनाशके, खते खपविण्यासाठी त्यांचा वापर केल्यामुळे शेतकरी श्रीमंत झाला, बायकोच्या अंगावर सोने, दारात चार चाकी कार, टुमदार बंगला अशा प्रकारे आभासी दाखवून इतर घटकांना शेतकऱ्याबद्दल चुकीची समजूत करीत आहेत. त्यामुळेच अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून कथा, कादंबरी, गझल, कविता, लेख, इत्यादी साहित्या मधून शेतकरी लेखकांची नवी पिढी आपल्या लेखणीच्या माध्यमातून लढाई लढून कष्टकरी शेतकऱ्याच्या वास्तव जीवनावर आधारित लिखाण करून इतर घटकांना कष्टकरी शेतकऱ्याच्या वास्तव जीवनाची जाणीव करून देऊन केलेला गैरसमज दूर करतील तेव्हाच शहरातील बांधव कांदा शंभर रुपये प्रति किलो झाला तरीही शेतकऱ्यांना कडून विकत घेऊन आवडीने खातील सरकारवर दबाव आणून कांदा आयात करू देणार नाही आणि मोर्चा सुद्धा काढणार नाही.......!
तो सोन्याचा दिवस उगवेल तेव्हाच कष्टकरी शेतकऱ्याच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवून होईल....!
बारावे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, जयसिंगपूर
दिनांक : शनिवार, दि. ८ व रविवार, दि. ९ फेब्रुवारी, २०२५
स्थळ : युगात्मा शरद जोशी विद्यानगरी, सहकारमहर्षी शामराव
पाटील यड्रावकर नाट्यगृह जयसिंगपूर ता. शिरोळ जि. कोल्हापूर