Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



मातीमोल आयुष्य

लेखनविभाग: 
कथा

गद्यलेखन स्पर्धा - २०१९
विभाग : कथा : कर्जाच्या विळख्यात शेती
मातीमोल आयुष्य

विठोबा ! नावासारखाच साक्षात विठुमाऊलीच रूप ! सावळा रंग , कंबरेला सफेद धोतर , पायात कोल्हापुरी आपल , अगदी साधी राहणी . दिवसभर शेतात राब - राब राबायचे आणि संध्याकाळी विठोबाच्या देवळात भजनाला हजर राहायचे . रात्री चटणी - भाकरी खाऊन , हाताची उशी करून , फाटलेली गोधडी पांघरून झोपी जायचे . हा विठोबाचा रोजचा दिनक्रम . आणि यात त्याच कुटुंब त्याची साथ द्यायचा . त्याची बायको जणा आणि दोन मुलं महेश , रुपाली . खूप गोड कुटुंब .

विठोबाचे जीवन बऱ्यापैकी चालले होते . दोन वेळची भाकरी , अंग झाकण्यापुरते कपडे , घरखर्च कसाबसा भागत होता . विठोबा खूप मेहनती होता . त्याची बायको जणा घर व्यवस्थितरित्या सांभाळायची त्याबरोबरच शेतीच्या कामातही त्याला मदत करायची . असा एकमेकांना आधार देत त्यांचा संसार सुखाचा चालला होता . महेश आणि रुपाली गावातल्या सरकारी शाळेत शिकत होती . दोघे मन लावून शिकत होती .

पण म्हणतात ना की देव प्रत्येकाची परीक्षा बघत असतो किंवा असही म्हणता येईल की या सुखी संसाराला बहुतेक कोणाचीतरी नजर लागली असावी . त्या वर्षी पावसाने हजेरी लावलीच नाही . दुसऱ्या सगळ्या शेतकऱ्यांसारखे विठोबाही शेतात बैलजोडी जुंपून शेत जोतायच्या तयारीत होता . जवळ - जवळ पूर्ण शेत जोतून तयार झाले होते . आता फक्त पाऊसरायाच्या आगमनाकडे डोळे लागले होते . एकदा का पाऊस पडला की बिया पेरणीचे काम सुरू करण्याच्या तयारीत विठोबाच नाही तर गावचे सगळेच शेतकरी होते . परंतू पाऊस विठोबाच्या गावचा रस्ता विसरला होता बहुतेक ! मधेच कुठेतरी वस्तीला राहीला असावा . आकाशाकडे नजर लावून सगळ्यांचेच डोळे थकले होते . पण पाऊसराया काही दर्शन द्यावयास तयार नव्हता . का झाले असावे असे ? आधी असे कधीच घडले नव्हते . उशिरा का होईना , पाऊस आपली हजेरी लावायचाच . पण शेत जोतून एक महिना उलटला तरी आकाशात काळे ढग काही दिसेनात . आता मात्र विठोबासह गावातल्या प्रत्येक शेतक-याच्या मनात धडकी भरली आणि सगळ्यांना दुष्काळाची भीती सतावू लागली . पण कोणी बोलून दाखवत नव्हत , कारण अजून कोणी आशा सोडली नव्हती .

दोन महिने उलटले . आता मात्र विठोबाला काळजी वाटू लागली . शेतात जमिनीला भेगा पडल्या होत्या . गावातल्या तळयाचे , विहीरीचे पाणी आटून गेले होते . पाण्यासाठी गावकरी वणवण फिरत होते . दोन - तीन किलोमीटर अंतर चालून पाणी भरून आणत होते . जनावरही चारा आणि पाण्याविना अर्धमेली झाली होती . आपल्या सर्जा - राजाच्या काळजीने विठोबाला रात्र - रात्र झोप लागत नव्हती . त्यांना सुकलेला चारा का होईना तो पुरवत होता . पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करत होता . कारण सर्जा - राजा ही विठोबासाठी फक्त बैलजोडी नाही तर त्याच्या कुटुंबाचा भाग होता . त्यांच्या जीवावरच इतकी वर्षे विठोबा शेतीची कामे पूर्ण करायचा . आता अशा कठीण परिस्थितीत त्यांची काळजी घेणे हे त्याचे कर्त्तव्य होते . घरात बायको - पोरांची स्थितीही बिकट होती . दोन वेळेचे अन्न शिजवण्यासाठी सुद्धा कष्ट पडत होते . जणा खूप हिंमतीने परिस्थिती सांभाळत होती .

घरातील धान्य संपले होते . त्या दिवशी जणाच्या डोळ्यांत अश्रु काठोकाठ भरले होते . कधी नव्हे ती अशी वाईट वेळ तिच्या कुटुंबावर , गावावर आणि प्रियजनांवर ओढवली होती . विठोबाला जेव्हा हे समजले , एका क्षणासाठी त्याला काय करावं ते सुचेना . मग शेवटी काहीतरी विचार करत तो घराबाहेर पडला आणि थेट जमीनदाराच्या घरासमोर येऊन थांबला . त्याच्या आधीच काही शेतकरी आणि गावकरी जमीनदाराकडून काही मदत मिळते का या आशेने तिथे जमले होते . पण नंतर त्याला समजले की काहीतरी गहाण ठेवले तरच जमीनदार पैसे किंवा धन - धान्य देणार . ही खूप गंभीर बाब होती . जमीनदार अशा अडचणीच्या काळातही गावकऱ्यांचा फायदा उठवण्यास धजत नव्हता . विठोबाला एका क्षणासाठी जमीनदाराचा खूप राग आला . पण काय करणार ? दुष्काळामुळे सगळ्यांचेच हात - पाय बांधले गेले होते . विठोबा त्याच क्षणी घरी परतला . त्याने जणाच्या सोन्याच्या कानातल्या कुडया कापडात गुंडाळल्या आणि जमीनदाराकडे जायला निघाला. जणाच्या चेहऱ्यावर प्रश्न चिन्ह उमटले , पण तिने तोंडातून चकार शब्दही काढला नाही . तिला बहुतेक परिस्थितीचा अंदाज आला असावा . विठोबा लगोलग जमीनदाराकडे पोहोचला आणि दागिने गहाण टाकून पैसे घेऊन आला . येताना वाण्याकडून घरासाठी लागणारे जिन्नस घेऊन आला . त्याबरोबरच मुलांना खाऊ , कपडे , शाळेच्या उपयोगाचे साहित्य आणि मुख्य म्हणजे सर्जा - राजासाठी हिरवा चारा ! थोडया वेळासाठी का होईना सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून विठोबाला समाधान वाटले . पण एका विचाराने त्याचे मन धजावले आणि ते म्हणजे हे असे किती दिवस चालणार ? दिवसेंदिवस परिस्थिती अजूनही गंभीर होत चालली होती . घर - दार , बायको - मुले आणि आपल्या जनावरांना दुष्काळाच्या तडाख्यातून वाचविण्यासाठी विठोबाने एक - एक करत जणाचे सगळे दागिने गहाण ठेवले . घरातील तांब्या- पितळेची भांडीही विकली . शेवटी एक दिवस असा आला की ज्या दिवशी विठोबाने जमीनदाराकडे आपली काळी आई , आपल्या जमिनीचा तुकडा गहाण टाकला . जणाने खूप अडवले पण विठोबाला हे हलाखीचे दिवस पाहवत नव्हते . तो आपल्या परिवारासाठी स्वतःचा जीव देण्यासही तयार होता . पण जीव द्यायची वेळ विठोबाच्या जीवनात लवकरच येईल असे त्याला , जणाला किंवा त्याच्या मुलांना स्वप्नातही वाटले नव्हते .

सर्जा - राजाची हालत मुबलक प्रमाणात खाद्य आणि पाणी न मिळाल्यामुळे खूपच खंगून गेली होती . आखिर त्या दोघांनी आपले प्राण सोडून दिले . विठोबा त्या दिवशी दोघांच्या गळ्यात पडून खूप रडला . जणा आणि पोरांचीही आसव थांबायचे नाव घेत नव्हती . कारण त्यांच्या परिवाराचे सर्वात प्रिय सदस्य दुरावले गेले होते . त्यांच्या अशा जाण्याने विठोबा पूर्णपणे खचून गेला . त्याच्या डोळ्यांसमोरून थांबायच - राजाचे चेहरे काही करून हटत नव्हते . त्यांच्या आठवणींनी विठोबाचे काळीज तुटायचे .

कर्जाचा डोंगर विठोबाच्या मानगुटीवर बसला होता . रात्र - रात्रभर त्याच्या डोळ्याला डोळे लागत नव्हते . कधी झोप लागलीच तर दचकून जागा व्हायचा . विठोबाचे धैर्य संपत चालले होते . त्याचा आत्मविश्वास जवळ - जवळ संपुष्टात आला होता . जणाला हे सगळे कळत होते . ती आपल्या नवऱ्याला खूप जपत होती . समजावत होती की ही परिस्थिती अशीच राहणार नाही . लवकरच बदलाव येईल . पाऊसराया आपल्यावर कृपादृष्टी जरूर दाखवेल . काळी आई पुन्हा आपल्या लेकरांना कुशीत घेईल . हिरवाईने आपले जीवनही हिरवगार होईल . पण विठोबाला जणाचे बोलणे स्वप्नगत वाटायचे . हे सुंदर स्वप्न आता कधीच पूर्ण होणार नाही , अशी त्याच्या मनाची खात्री पटली होती . अशाच विचारांनीशी खूप उशिरा त्याचे डोळे लागले .

दुस-या दिवशी विठोबा पहाटेच उठला . जणा आणि मुले अजून झोपली होती . ते सुकलेले चेहरे पाहून विठोबाच्या डोळ्यांत पाणी भरून आले . किती समाधानी जीवन तो जगत होता . पण हे काय होऊन बसले ! निसर्गाचे चक्र इतक्या वाईट रीतीने फिरेल असे त्याला कधीच वाटले नव्हते . तो निसर्गासमोर हरला होता . अंथरूणातून उठून लगबगीने आपल्या शेताकडे चालू लागला . मनात हजारो गोष्टींनी थैमान घातले होते . विचारांच्या तंद्रीत असतानाच तो शेतावर येऊन पोहोचला . तिथे पोहोचताक्षणी काळ्या आईची दुष्काळामुळे झालेली परिस्थिती बघून त्याने जोरात टाहो फोडला . त्याचे आक्रंदन ऐकायला आसपास कुणीच नव्हते . त्याचे रडणे , ओरडणे हवेत विरघळून गेले .

विठोबाच्या शेताच्या बांधावरती वडाचे एक झाड होते . पाऊस न पडल्यामुळे झाड सुकून सगळी पाने केव्हाची गळून गेली होती . विठोबाला एका क्षणासाठी वाटले की त्याची प्रतिकृतीच त्याच्यासमोर उभी आहे . प्रतिकृती - सुकलेली , वाळलेली ! त्याने धावत जाऊन झाडाला घट्ट मिठी मारली . परिस्थितीने जार - जार झालेले धोतर जे त्याने कंबरेवर लपेटले होते , झटकन कमरेवरून काढले आणि झाडाला बांधून त्याचा फास बनवला . तो फास स्वतःच्या गळ्यात अडकवला अन् शरीर झोकून दिले . क्षणार्धात सगळे संपून गेले . सगळी स्वप्ने , आश्वासने , जगण्याची आशा ! सगळेच काही ! गावकऱ्यांकडून ही बातमी जेव्हा जणाला कळाली , आधी तिला विश्वासच बसला नाही . ती वेडयासारखी शेताकडे धावत सुटली आणि तिच्या मागून मुलेही धावली . प्रत्यक्षात ते दृश्य बघून जणा बेशुद्ध होऊन धरतीवर कोसळली . दोन्ही मुले खूप घाबरली होती . त्यांना काय करावे काही कळत नव्हते . आईला उठवायचा प्रयत्न करत होती , रडत होती . आणि हे सर्व बघता तिथे जमलेल्या गावकऱ्यांचे काळीज तुटत होते . कारण काळया मातीचा पुत्र अखेर मातीत एकरूप झाला होता . क्षणार्धात विठोबाचे आणि त्याच्या कुटुंबाचे अख्खे आयुष्य मातीमोल झाले होते .

शोधखुणा: 
Share

प्रतिक्रिया