Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक
नियोजित संमेलनाचे प्रारूप, उपक्रम आणि गुरुकुंजाला कसे पोचावे याबद्दल इत्यंभूत माहिती देणारा व्हीडिओ.
शेतकरी साहित्य संमेलनाचे LIVE प्रसारण "शेतकऱ्यांची चावडी" या You Tube चॅनेलवर होणार आहे.
त्यासाठी आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



पुस्तक समीक्षण - शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपध्दती

लेखनप्रकार: 
समीक्षण-रसग्रहण स्पर्धा-२०१६
लेखनविभाग: 
गद्य पुस्तक समीक्षण
पुस्तक समीक्षण - शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपध्दती

लेखक - मा. शरद जोशी
प्रकाशक - जनशक्ती बुक्स अ‍ॅड पब्लिकेशन प्रा. लि.

शेतकरी आंदोलन उभे करतांना, मा. शरद जोशींनी जी शेतकरी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरे घेतली, त्यात जी साधक-बाधक चर्चा झाली, त्या चर्चेचे शब्दांकित रुप म्हणजे हे पुस्तक आहे.

         ९ ऑगस्ट १९८९ रोजी चाकण येथे शेतकरी संघटनेच्या कार्यालयाचा शुभारंभ झाला. १९७९ पासून 'शेतीमालास रास्त भाव' या एककलमी कार्यक्रमासाठी कांदा, उस, तंबाखू, दूध, भात, कापूस इत्यादी पिकांच्या शेतकरी आंदोलनांची सुरुवात झाली. शेतकरी आंदोलनाची उद्दिष्ट्ये / विचार, शेतकर्‍याचे प्रश्न, आंदोलनाची कार्यपध्दती कशी आहे? याचा सांगोपांग विचार या पुस्तकात मांडला आहे.

         गांजलेला शेतकरी दिशाहिन होता. आधी झालेली आंदोलने दडपली गेली, अयशस्वी झाली. शेतकरी निराश झाला होता. अशा वेळी त्याला उठवणे, उभे करणे अवघड होते. पण छोट्या छोट्या आंदोलनांना मिळणार्‍या यशाने त्याच्या आशा पल्लवित झाल्या व तो मा. शरद जोशींच्या नेतृत्वाखाली उभा राहिला. यावेळी सर्वात जास्त गरज होती, त्याचे मनोधैर्य टिकवण्याची! मा. शरद जोशींनी हे शिवधनुष्य पेलले. सोबत आलेल्या शेतकर्‍यांना त्यांचा हक्क मिळावा, त्यांचा मेहनताना मिळावा यासाठी ते सत्ताधीश सरकारविरुध्द ठामपणे उभे राहिले.

शेतकरी आंदोलनाची दिशा काय होती / असावी, कुठले प्रश्न मांडावेत कधी मांडावेत, आंदोलनाची वेळ काय असावी, याचा शेतकर्‍याच्या दृष्टीकोनातून विचार करुन आखणी केली गेली. पेरणीची वेळ, ग्राहकाची गरज, मौसम या सर्वांचा विचार करुन कशा प्रकारचे आंदोलन करायचे आहे ते ठरवले जायचे. जेणे करुन शेतकर्‍याचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होऊ नये किंवा कमीत कमी नुकसान व्हावे. उदा. लग्नसराईतले  दूध आंदोलन.

शेतकरी आंदोलन हे केवळ शेतकरी श्रीमंत व्हावा म्हणून नव्हते तर त्यायोगे देशातले दारिद्र्य हटावे असाच विचार यामागे होता. आंदोलनातले प्रश्न पुढीलप्रमाणे होते:

१) शेतीमालाला रास्त भाव - शेतकर्‍याच्या दारिद्र्यामागे 'शेतीमालाला भाव मिळत नाही' हे एकमेव कारण आहे. कारण सरकारी धोरण आहे:

अ) तूट असेल तर लूट, मुबलकता असेल तर लिलाव, ब) शेतीमालावर निर्यातबंदी आणि क) पक्क्या मालाचे कारखाने निघाले तरी शेतीमाल अल्प किंमतीत विकत घेणे.

शेतीमालाला उत्पादनखर्चा इतका भाव मिळाला तर बरेच प्रश्न सुटतील. जसे,

* शेती उत्पादन वाढेल.
* गरीबातील गरीब घटकांपर्यत नवीन उत्पन्नाचा फायदा वाढत्या मजुरीच्या रुपाने पोहोचेल.
* ग्रामीण भागातील कर्जबाजारीपणा निकालात निघेल.
* इंडिया - भारत दरी नाहीशी होईल.
* ग्रामीण भागात उद्योगधंदे निर्माण होऊन बेकारी हटेल.
* आजच्या औद्यौगिक विकासाच्या अनर्थकारक धोरणाचे दुष्परीणाम टळतील.
* ग्राहकांना आजपर्यंत न मिळालेली उपभोग्य वस्तूंची विविधता दिसेल.
* उद्योगधंद्यात तयार होणार्‍या मालास बाजारपेठेत भरपूर मागणी मिळून त्यांची ही भरभराट होईल.

२) शेतकर्‍याचे सरकार आणि सावकारांकडून होणारे शोषण थांबवणे - आर्थिकदृष्ट्या देशाचे दोन भाग झालेले आहेतः एक भारत आणि दुसरा इंडिया. ज्याच्यातला इंडिया हा भारताच्या शोषणावर जगतो आहे आणि जास्तीत जास्त शोषण करीत चालला आहे. स्वातंत्र्यानंतर ही भारताचे शोषण होतेच आहे.

३) उलटी पट्टी - दलालामार्फत भाजीपाल्यासारखा शेतीमाल बाजारात पाठविल्यावर त्याच्या किमतीची जी पट्टी येते, त्यात वहातूक, दलाली, हमाली, पॅकिंग वगैरेंचा खर्च वजा जाता काही शिल्लक न रहाता, शेतकर्‍याच्याच अंगावर काही देणे रहाते यालाच 'उलटी पट्टी' म्हणतात. ज्याला याचा अनुभव आला आहे, त्याला शेतीमालाच्या किमतींचा प्रश्न समजणे अवघड नसते.

४) दलालांची मनमानी - शेतकर्‍याला मिळणारा भाव व ग्राहकाला द्यावी लागणारी किंमत यातली तफावत फार मोठी आहे, त्याला कारण आहेत मधले दलाल/ व्यापारी.

         १९८० पूर्वी शेतीची परीस्थिती वेगळी होती. 'जास्त मालः जास्त नफा' हे साधे सरळ गणित होते. पण नंतर परिस्थिती बदलली. 'जितका माल जास्तः तितका कमी भाव' हे नवीन तंत्र आले. गांजलेला शेतकरी हवालदिल झाला, खचला. आधीच शेतीमालाचा उत्पादनखर्च निघत नव्हता. बेभरवशाचा पाऊस, सावकारांचे अवाजवी व्याज, सरकारी अपुरी मदत, शेतीमालाचा पडता भाव याने तो अधिकच दरीद्री होत गेला. परिस्थितीतून कसे बाहेर पडावे? आपले गार्‍हाणे कुणाला सांगावे? हे त्याला कळत नव्हते. अशात मा. शरद जोशी, स्वतः शेतकरी नसतांना ही, त्यांच्या प्रश्नांसाठी उभे राहिले, बोलू लागले. हळूहळू विखुरलेला शेतकरी, 'शेतकरी संघटने' च्या झेंड्याखाली गोळा होऊ लागला. पण हे जमलेले शेतकरी अल्पशिक्षीत, ग्रामीण भागांतून आलेले होते. त्यांना शेतकरी संघटनेची तत्त्वे साध्या सोप्या भाषेत समजावणे गरजेचे होते. त्याच विचाराने मा. शरद जोशीनी 'शेतकरी शिबीरे' घेतली. शेतीमाल कमीत कमी भावांत घेण्याचे सरकारी धोरण, जे इंग्रजांनी लागू केले होते, ते तसेच सुरु होते. ते बदलणे गरजेचे होते.
         या पुस्तकात शेतकर्‍याशी निगडीत प्रत्येक गोष्टींचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. जसे, शेतीमालाचा उत्पादनखर्च कसा काढावा? रास्त भाव म्हणजे काय? शेतकरी व शेतमजूरांचे प्रश्न, इंडीया व भारत यातली तफावत, मजूरीतला स्त्री - पुरुष भेदभाव, शेतीच्या ताळेबंदातील न मांडता येणारे नुकसान, जसे मातीची पिकांगणिक घसरणारी प्रतवारी.

         प्रत्येक शेतकर्‍याने वाचावे व समजून घ्यावे असेच हे पुस्तक आहे. शेतकरी नसणार्‍यांना यातला उत्पादन खर्च काढण्याचे जे प्रकरण आहे ते क्लिष्ट वाटू शकते, कारण त्या गोष्टींशी आपला प्रत्यक्ष संबंध येत नाही. पण ते समजून घेणे गरजेचे आहे. कारण तोच या सर्वाचा पाया आहे. शेतकर्‍याची परिस्थिती बदलावी म्हणून काय करायला हवे ते मा. शरद जोशींनी सरळपणे मांडले आहे. आधी सहकारी संस्था स्थापन व्हायच्या. पण तो मार्ग पण उपयोगाचा नाही. माल वेळेत विकणे गरजेचे आहे. आपला शेतकरी व्यापार्‍याला टक्कर देवू शकत नाही, कारण त्यासाठी गोदामं हवीत. खर्चासाठी कर्जाची सोय हवी. पण आर्थिक कमकुवतपणामुळे तो हे करु शकत नाही. शासनाने ठरवले तर शेतीमालावर प्रक्रिया करण्याचे कारखाने सुरु करुन ते शेतकर्‍याला मदत करु शकतात. अशाने शेतकर्‍याची परिस्थिती सुधारत जाईल व इंडिया व भारतातील तफावत नष्ट होईल.
         शेतीमालाला रास्त भाव मिळाला की शेतकर्‍याचे रहाणीमान सुधारत जाईल. शेतीत चांगले बियाणे, खते वापरल्याने उत्पादन वाढेल. कर्ज फिटतील. शेतमजुरीचे दर वाढतील. तो शेतजमिनीत सुधारणा करु शकेल, विहिर बांधून घेवू शकेल, पुरेसा पैसा गाठीला असला की शेतीला पूरक छोटे छोटे उद्योगधंदे काढू शकेल. त्यायोगे रोजगार उपलब्ध होतील. संघटनेचा हा लढा एका व्यवस्थेच्या विरुध्द आहे व तो आर्थिक पातळीवर आहे हे मा. शरद जोशींनी यात वारंवार उध्घृत केले आहे. शेतकरी संघटनेचे हे काम शेतकरी स्त्रीयांपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे होते. त्यादृष्टीने ही गावपातळीवर प्रयत्न केले गेले.  

         अर्थात कमी वेळात संकलन केले गेल्याने यात काही संपादकीय त्रुटी पण आहेत हे प्रकाशक स्वतःच मान्य करतात. असे असले तरी ही या पुस्तकांची हिंदी, गुजराती, कन्नड व तेलगू भाषांतरे झाली आहेत. आणि हेच या पुस्तकाचे मोठे यश म्हणावे लागेल.

         भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया असणारी शेती कशी व कुठल्या पायरीवर उभी आहे हे समजून घेण्यासाठी शेतकर्‍यानेच नाही तर प्रत्येक भारतीयाने हे पुस्तक अभ्यासावे असेच मी म्हणेन.

जय जवान! जय किसान!

- विनिता माने - पिसाळ
पुणे महाराष्ट्र

Share

प्रतिक्रिया